सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूच्या ठिकाणी उमललेले ‘सहस्रदल कमल’ आहे. विश्वातील परमशक्तीचे हे प्रवेश केंद्र असून याचे मुख वरच्या दिशेस असते. सहस्रार चक्र व मूलाधार चक्र एकमेकांस संतुलित करतात. हे चक्र शरीरास परमतत्त्व पुरविते, ज्याला अमृत असेही म्हटले जाते. जे जिवाला जीवन देते. पंचतत्त्वांमध्ये कार्य करण्याचा भाव महत्तत्त्वामुळे जागृत झाल्यावर, त्यास कार्य करण्याची क्षमता परमतत्त्वामुळे प्राप्त होते.
सहस्रार चक्र हे शरीरातील ब्रह्मजागृतीचे केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे. नेणीव हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव यामुळे येतो. परमात्म्याचे ज्ञान येथे होते. पर म्हणजे पलीकडे. आत्म्यापलीकडे, तत्त्वांपलीकडे म्हणजेच आपल्या जाणिवा, संकल्पना, बुद्धीपलिकडे असणारी अनुभूती किंवा साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. उदा. मोगऱ्याचा सुवास. वास ही जाणीव आहे. मात्र त्यातून होणारा आंतरिक आनंद, प्रसन्नता, समाधान ही नेणीव आहे. अनुभव हा जड सृष्टीशी संबंधित असतो तर, अनुभूती ही त्या पलीकडे असते. ज्याचे सहस्रार चक्र सक्षम असते, ती व्यक्ती परोपकारी, आत्मज्ञानी असते.