विनाऔषध विनास्पर्श

Niraamay Swayampurna Upchar logo - healing without medicines and physical touch

स्वतःला निरोगी राखण्याची विलक्षण शक्ती निसर्गाकडे आहे. मानवी देह हादेखील निसर्गाचाच एक भाग. स्थूल देह आणि सूक्ष्म देह असे याचे वर्गीकरण होते. स्थूल देह निसर्गातील स्थूल/जड गोष्टींवर (अन्न) पोसला जातो, तर सूक्ष्म देह निसर्गातील सूक्ष्म गोष्टींवर (ऊर्जा) पोषित होतो. ‘मन’ हे सूक्ष्म देहाचा भाग असून स्थूल देहाला प्रभावित करते. योग्य आहार, योग्य विहार (सद्वृत्तीने परिस्थितीनुरूप केलेले आचरण) आणि योग्य विचार माणसास निरोगी ठेवतात.

मानवी देह तेव्हाच आजारी पडतो, जेव्हा तो स्वतःला बरे करू शकत नाही. कोणताही आजार हा एका दिवसात निर्माण होत नाही. साठत गेलेले दोष, बरे करण्यासाठी देहाला न दिलेला वेळ, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन, गर्भापासून झालेले संस्कार व पूर्वकर्म इत्यादींचा परिपाक म्हणजे ‘आजार’. आजार म्हणजे शरीराची व मनाची कमी झालेली ताकद. ‘स्वयंपूर्ण उपचार’ हे शरीर व मनात साठलेल्या दोषांचा निचरा करून त्यास वातावरणातून आवश्यक ताकद (ऊर्जा) पुरवतात. शरीर व मनाची ताकद जशी पूर्ववत होत जाते, तसा आजार नष्ट होत जातो. मात्र यासाठी आवश्यक असतो रुग्णाचा दृढ संकल्प.

संकल्पना

तैत्तिरीय उपनिषदांनुसार संपूर्ण चराचर पंचतत्त्वांतून निर्माण झाले आहे. यत्र तत्र सर्वत्र ही पंचतत्त्वे ऊर्जारूप भरून राहिली आहेत. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा आणि भू ऊर्जा. वेदान्तशास्त्राप्रमाणे प्रत्येक तत्त्वामध्ये स्वतःचा 50% अंश व इतर चार तत्त्वांचा प्रत्येकी 12.5% अंश असतो. ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही, ती केवळ परिवर्तित होते. कोणत्याही तत्त्वांचे प्रमाण जसे बदलते, तशी प्रकृतीतील त्याची संरचना बदलत जाते.

उदा. पाण्यामध्ये अग्नीचा अंश वाढू लागला की त्यातील जलतत्त्व कमी होऊन त्याचे वायूमध्ये (बाष्प) रूपांतर होते. जर पाण्यातील अग्नीचा अंश कमी होऊ लागला तर त्यातील पृथ्वीचा अंश वाढू लागतो व त्याचे बर्फात रूपांतर होते. बाष्पातील जल वाढू लागले की त्याचे पाण्यात रूपांतर होते. बर्फातील अग्नी वाढू लागला की पाणी बनते.

मानवी देहदेखील पाच तत्त्वांपासून बनलेला आहे. या देहातील पाच तत्त्वांचे असंतुलन हे आजारास किंवा दोषास कारणीभूत असते. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे देहातील पाच तत्त्वं संतुलित करण्याची क्रिया केली जाते. देहास आवश्यक असणारी ऊर्जा निसर्गातून पुरविली जाते व अतिरिक्त साठलेली ऊर्जा निसर्गात मुक्त केली जाते. ज्यामुळे मानवी देह संतुलित होऊन त्यास आरोग्य मिळू शकते.

Bhagwan Krishna

आधार

महाभारतात प्रभू श्रीकृष्णांनी कर्मयोगापासून ते मोक्षसंन्यासयोगापर्यंत ‘योगांचे’ यथार्थ वर्णन केले आहे. ‘योगः चित्तवृत्ती निरोधः’ अर्थात ‘चित्तवृत्तींचा निरोध किंवा चित्तवृत्तींना निर्विकार करणे’ म्हणजे योग. चंचल मनाला शांत करणे, इंद्रियांवर ताबा मिळविणे, विषयांच्या अधीन न होता प्रकृतीशी एकरूप होणे म्हणजे योग. योग ही एक जीवनपद्धती आहे आणि ती साधण्यासाठी महर्षी पतंजलींनी ‘योगशास्त्राची’ निर्मिती केली. योगशास्त्रामध्ये परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या आठ पायऱ्या सांगितल्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याला अष्टांगयोग असे म्हटले जाते.

अष्टांग योग

अष्टांगयोगातील पहिली पाच अंगे म्हणजे – ‘यम (सामाजिक नैतिकता), नियम (व्यक्तिगत नैतिकता), आसन (शारीरिक नियंत्रण), प्राणायाम (ऊर्जेचे नियंत्रण), प्रत्याहार (इंद्रियांचे नियंत्रण)’ याला बाह्यांग म्हटले आहे. याचे पालन केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त होते. तर अंतरंग म्हणजे ‘धारणा (चित्त स्थिरता), ध्यान (चित्त एकतानता) आणि समाधी (एकरूपता)’. हे साधून परमात्मज्ञानापर्यंत पोहोचता येते.

Yam - Ethical Social Conduct

माणूस हा समाजप्रिय प्राणी असून समाजातील प्रत्येक घटकाशी बांधलेला आहे. माणसाने समाजाप्रति निर्माण केलेला प्रत्येक विचार व कृती ही काही ऊर्जा निर्माण करते. तसेच समाजातील प्रत्येक स्तराकडून येणारे ऊर्जेचे प्रवाह व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम करतात. योगशास्त्रात समाजाप्रति नैतिक आचरण कसे असावे, यासाठी 5 यम सांगितले आहेत, ते खालीलप्रमाणे,

अहिंसा : काया, वाचा, मन व बुद्धी यांनी कुणालाही इजा/दुखापत न करणे.

सत्य : वागण्या-बोलण्यात कायम खरेपणा ठेवणे, खोटे न बोलणे.

अस्तेय : चोरी न करणे, परक्या वस्तूप्रति निःस्पृहता बाळगणे.

ब्रह्मचर्य : मायेपासून स्वतःला दूर ठेवत केलेले आचरण किंवा आत्मसंयम.

अपरिग्रह : लोभ न करणे, दुसऱ्याच्या वाट्याचे न हिसकावणे, अनावश्यक साठा न करणे.

कोणत्याही भौतिक गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी, मानसिक सुख-समाधान मिळविण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी तसेच आत्मानंदाची अनुभूती घेण्यासाठी मिळालेले साधन म्हणजे ‘देह’. या देहाप्रति (स्थूल व सूक्ष्म) नैतिक आचरण कसे असावे यासाठी योगशास्त्रात 5 नियम सांगितले आहेत, ते खालीलप्रमाणे,

शौच : अंतर्बाह्य शुद्धीकरण/स्वच्छता, शरीर-मन-वातावरणाची स्वच्छता.

संतोष : तोष म्हणजे तृप्ती किंवा समाधान. संतोष म्हणजे आतपर्यंत तृप्तीची भावना. आपल्या प्रयत्नाने, कर्माने आपणास जे जे मिळाले आहे त्याप्रति समाधानी, आनंदी असणे.

तपस : परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर पडणे. स्वतःच्या चुकांबद्दल खेद वाटणे, आत्मक्लेश किंवा पश्चात्ताप होणे. अडचणीत किंवा दुःखात सहनशील राहणे, त्रागा न करता सोशिकता ठेवणे.

स्वाध्याय : स्वतःचा शोध/अध्ययन, स्वतःच्यामधील दोष, कमतरता शोधणे व काढणे. स्वतःचा अभ्यास करीत उत्कर्ष साधणे.

ईश्वर प्रणिधान : कर्माचे मिळालेले फळ  ईश्वराला अर्पण करणे किंवा समर्पण. धन, धान्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती हे ‘मी’ मिळवलेले नसून, हे कार्य माझ्याकडून त्या परमशक्तीने करवून घेतले आहे हा भाव ठेवणे.

Niyam - Personal Ethical Conduct
Aasan - Bodily Stability

पातंजल योगसूत्रात आसनाचे वर्णन ‘स्थिरसुखम्‌‍आसनम्‌‍।’ असे केले आहे. सुखकारक स्थितीतील स्थिर, अविचल अवस्था म्हणजे आसन. शरीर लवचीक, तंदुरुस्त आणि कणखर राखण्यासाठी शरीराची विशिष्ट आकृती म्हणजे आसन. यातून शरीराची व मनाची दृढता, चित्ताची स्थिरता साधते.

यम-नियम पाळणाऱ्या व्यक्तीच्या नाड्या स्वच्छ व शुद्ध असतात. कोणतीच दोषयुक्त ऊर्जा त्यामध्ये नसते. सांधे मोकळे असतात. त्यामुळे आसन सहज शक्य होते. उलटपक्षी आसनामुळेदेखील नाड्या व साध्यांमधील दोषयुक्त ऊर्जा मुक्त होण्यास मदत होते. मात्र यम-नियम न पाळल्यास ती पुन्हा साठू लागते व आसनाचा परिणाम तात्पुरताच टिकतो.

प्राण + आयाम म्हणजेच प्राणाचे किंवा ऊर्जेचे नियमन. प्राण म्हणजे प्रत्येक पेशीला चैतन्य देणारी जीवनऊर्जा. आपल्या ऊर्जादेहात असणाऱ्या असंख्य नाड्यांमार्फत सतत वातावरणातील ब्रह्मांडीय ऊर्जा शोषून घेतली जात असते आणि वापरलेली ऊर्जा उत्सर्जित केली जात असते. श्वासोच्छ्वासाद्वारे या प्राणाची कक्षा वाढविण्यासाठी करण्याची क्रिया म्हणजे प्राणायाम. शरीर चैतन्यमय होण्यासाठी प्राणायामाचा उपयोग होतो.

अनुलोम-विलोम प्राणायामामुळे आपली उजवी नाडी/सूर्य नाडी जी धनऊर्जा (उष्णता) प्रवाहित करते, तर डावी नाडी/चंद्र नाडी जी ऋणऊर्जा (शीतलता) प्रवाहित करते, या दोन्ही नाड्या शुद्ध व सशक्त होतात. कपालभाती प्राणायामामुळे मणिपूर, स्वाधिष्ठान व मूलाधार चक्र सशक्त होतात. भस्त्रिका प्राणायामामुळे आज्ञा, विशुद्धी व अनाहत चक्र सशक्त होतात. जो ओंकाराचा नाद घुमतो तो शरीर अंतर्बाह्य शुद्ध करतो. शीतली प्राणायाम शरीराला शीतलता प्रदान करतो. प्राणायामामुळे शरीरातील सत्त्वगुण प्रबळ होतात.

Pranayam - Control of Life Energy
Pratyahar - Control Over the Organs

पातंजल योगसूत्रात प्रत्याहाराचे वर्णन ‘स्वविषयासंप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवइन्द्रीयाणाम्‌‍ प्रत्याहारः।’ असे केले आहे. इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संयोग नसताना म्हणजेच कोणत्याही अपेक्षेशिवाय शून्यावस्थेत इंद्रियांनी केलेले नैसर्गिक वर्तन म्हणजे प्रत्याहार.

अकरा इंद्रिये म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये (ज्ञानाची साधने) : श्रोत्र (कान), त्वक (त्वचा), नेत्र (डोळे), रसना (जीभ), घ्राण (नाक). पाच कर्मेंद्रिये (कर्माची साधने) : वा‍क् (तोंड), पाणि (हात), पाद (पाय), पायु (गुदद्वार) व उपस्थ (जननेंद्रिय). अकरावे इंद्रिय अंतःकरण होय. मन आणि बुद्धी या इंद्रियांना भ्रमित करते. मन कामना निर्माण करते आणि बुद्धी तशी सूचना प्रत्येक पेशीस देते आणि शरीर तसे वर्तन करते. जे दोषास कारणीभूत ठरते. निर्विकार चित्ताने केलेले शरीरधर्म पालन म्हणजे प्रत्याहार.

धारणा – धारणा म्हणजे एखादे ध्येय्य किंवा कर्म निश्चित केल्यानंतर, त्याच्या पूर्णत्वासाठीचे चित्ताचे संपूर्ण योगदान. इतर कोणताही विचार मनात न आणता कर्मसाफल्याचा ध्यास घेणे म्हणजे धारणा.

पातंजल योगसूत्रात “देशबन्धश्चित्तस्य इति धारणा” असे वर्णन आहे. धारणेच्या संदर्भात देश म्हणजे कोणतेही “साध्य”. आणि या साध्यावर चित्त बांधून ठेवणे, ही झाली धारणा. सर्व चराचराविषयी समान बुद्धी ठेवणे, मन काबूत ठेवणे, स्थिर करणे, पूर्वग्रहदूषित न राहता, चित्त साध्यावर एकाग्र करणे. जागृतावस्थेत चित्त संपूर्ण शरीरभर संचार करीत असते. ज्ञानेंद्रिये विषयाचे ग्रहण करीत असतात तर कर्मेंद्रिये कर्मरत असतात. त्या वेळी चित्त त्या त्या विषयावर अथवा शरीराच्या त्या त्या भागावर स्थिर होत असते. विषयासक्ती सोडून ही स्थिरता जाणीवपूर्वक शरीराच्या कोणत्याही भागावर किंवा एखाद्या वस्तूवर आणणे म्हणजे धारणा. धारणेसाठी शरीरांतर्गत देश जसे चक्रस्थान (तालू, भ्रूमध्य, कंठ, हृदय, नाभी, जननेंद्रिय, गुदाची शिवण) निवडले, तर ती आध्यात्मिक धारणा होय.

Dharana - Stabilizing the Mind
Dhyan - Focused Concentration

ध्यान शब्द संस्कृत ‘ध्यै’ या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ आहे ‘चिंतन करणे’ चित्त एकवटणे. पातंजल योगसूत्र – तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्‌‍। धारणेच्या आधारभूत विषयावर एकतानतेचा (अवस्था अखंडपणे टिकवणे) व्यत्ययरहित अनुभव घेणे, जागरूक होणे म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये शरीराच्या हालचाली, मनातील विचार व भावना लय पावलेल्या असतात. शरीर, मन, बुद्धीच्या पलीकडे केवळ अस्तित्वाची जाणीव शिल्लक असते.

घेरण्डसंहितेत स्थूलध्यान, ज्योतिर्ध्यान आणि सूक्ष्मध्यान असे तीन प्रकार सांगितले आहेत. स्थूलध्यान हे मूर्तीवर असते जे जडाशी किंवा विषयाशी निगडित असते. ज्योतिर्ध्यान हे तुपाच्या ज्योतीवर असते, जे ज्ञानाशी निगडित असते तर सूक्ष्मध्यान हे ब्रह्मबिंदूवर म्हणजे दोन भुवयांमधील ओंकाररूपी तेजावर (आज्ञाचक्राचे सुषुम्ना नाडीवरील स्थान) केले जाते, जे ब्रह्मज्ञानाशी निगडित असते.

धारणा म्हणजे स्थिरता, ही स्थिरता टिकवून ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान आणि समाधी म्हणजे त्यात एकरूप होऊन गेल्यावर निर्माण झालेली स्थिती, तद्रुपता. तद्रुपता म्हणजे तद् रूप होणे. चित्ताची अशी अवस्था, जिथे सर्व चित्त-वृत्ती व संस्कारांचा लय होतो. समाधीमध्ये ध्याता (ध्यान करणारा) आणि ध्येय (ज्याचे ध्यान करत आहे ते) दोन्ही गळून जाते आणि फक्त शुद्ध जाणीव शिल्लक राहते.

माझी म्हणजे मी या व्यक्तीची चेतना एकरूप होऊन जाते जसे पाण्यात मिठाचे अस्तित्व संपून जावे त्याप्रमाणे शरीर, मन, बुद्धी या चैतन्यतत्त्वात विलीन होऊन जातात. माझे अस्तित्व हे केवळ शरीर नसून त्यातील शुद्ध चैतन्य आहे, हा अनुभव येतो. हेच चैतन्यतत्त्व प्रत्येकामध्ये असल्यामुळे समबुद्धी विकसित होते. सर्व द्वंद्वांमध्ये अंतःकरणाचा समतोल राखण्याची क्षमता विकसित होते.

महर्षि पतंजलींनी समाधीचे वर्गीकरण सबीज आणि निर्बीज समाधी असेही केले आहे. पूर्वकर्माचे संस्कार जेव्हा बीजरूपाने शिल्लक असतात, तेव्हा ती सबीज समाधी. जसा पूर्वकर्माच्या संस्कारांचा लोप होतो तेव्हा निर्बीज समाधी साधता येते. ही योगसाधनेची परमोच्च पायरी आहे. निर्बीज समाधीतूनच कैवल्यप्राप्ती होते.

अद्वैत वेदान्तामध्ये समाधीचे वर्गीकरण सविकल्प आणि निर्विकल्प समधी असे केले आहे. मनात केल्या जाणाऱ्या कल्पना म्हणजे विकल्प. विकल्पाप्रमाणेच योग्याला अनुभव येतात. कल्पना किंवा विचारविरहित अशा निर्विकल्प समाधीलाच ब्रह्मसाक्षात्कार मानले जाते.

Samadhi - Complete Oneness with Cosmic Energy

भगवान बुद्धांच्या, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार ‘आर्य अष्टांगिक मार्गा’ची विभागणी शील, समाधी आणि प्रज्ञा या तीन घटकांत केली जाते. शील म्हणजे सदाचरण, समाधी म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि या दोन्हीमुळे विकसित होणारी अंतःदृष्टी म्हणजे प्रज्ञा.

योगातील पहिल्या पाच अंगांच्या अनुसरणामुळे घडणारे अपेक्षित बदल, स्वयंपूर्ण उपचारांद्वारे ऊर्जेच्या माध्यमातून साधले जातात. ज्यामुळे रुग्णास शारीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त होऊ शकते. योगशास्त्रात धारणा, ध्यान आणि समाधी या पुढील तीन अंगांना एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा दिली आहे.

अंतर्भाव

भौतिक देहाचे पोषण अन्न करते, तर सूक्ष्म देहातील असंख्य नाड्यांमधून वाहणारी ऊर्जा प्रत्येक पेशीस पंचप्राण पुरविते. सुषुम्ना नाडी ही शरीरातील मुख्य नाडी असून ती मेरुदंडावर स्थित आहे. ती टाळूच्या मधोमध सहस्रार चक्रातून मूलाधारापर्यंत जाते. दुपार, मध्यरात्र व संधिकालात, शरीराचा श्वासोच्छ्वास दोन्ही नाकपुड्यांमधून चालतो तेव्हा सुषुम्ना नाडी कार्यरत असते. उजवी नाडी ही ‘पिङ्गला’ सूर्य नाडी असून धनऊर्जा प्रभारित असते, उष्णता देते आणि शारीरिक क्रियांसाठी उपयुक्त ठरते.

तर डावी नाडी ही ‘इडा’ चंद्र नाडी असून ऋणऊर्जा प्रभारित असते, शीतलता देते आणि मानसिक कार्यात साहाय्यभूत ठरते. इडा व पिंड़्‌‍गला यातील प्रत्येक नाडी, सुमारे 3 तास कार्य करीत असते. इडा ही संवर्धक, पिंड़्‌‍गला ही संरक्षक आणि सुषुम्ना ही नियंत्रक नाडी समजली जाते. त्रिशिखि ब्राह्मण उपनिषदाप्रमाणे सुषुम्ना नाडीच्या अवतीभोवती 72,000 नाड्यांचा समूह असून, या नाड्यांच्या शाखा व उपशाखा अश्वत्थ वृक्षाच्या पानांइतक्या अगणित आहेत. आपल्या हाताच्या व पायाच्या पाच बोटांतूनही पाच नाड्या जात असून, या पाच तत्त्वांचे वहन करत असतात. अंगठा-अग्नितत्त्व, तर्जनी-वायुतत्त्व, मध्यमा-आकाशतत्त्व, अनामिका-पृथ्वीतत्त्व व करंगळी जलतत्त्वाचे नियमन करते.

स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

Spiritual science – Sapt Kosh

अध्यात्मशास्त्र

अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

Naturopathy

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व

संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

Nadis and Chakras​

योगशास्त्र : सप्तचक्रे

मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

The Science of Mudra​

मुद्राशास्त्र

मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

Psychology

मनोविज्ञान

आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

Akshar Brahma

अक्षरब्रह्म

क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!